सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

चित्रकलेला ओळख देणारी वाङमयीन संपदा Chitrakalela Olakh Denari Vangmayin Sampada


 चित्रकलेला ओळख देणारी वाङमयीन संपदा

आधुनिक काळात  कलेच्या  स्वरूपामध्ये बदल झालेला आपण बघू शकतो. तो बदल चांगला कि वाईट हा मुद्दा इथे येत नाही. मुद्दा हा आहे कि जो बदल जाणवतो त्यामध्ये कलेच्या मूळ तत्वांचा सार आहे कि नाही ते पाहणे.  सहाजिकच माणूस बदलतो तर कलेतही बदल होणे अपेक्षितच आहे आणि ते मानने अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे डबक्यामध्ये साचलेले पाणी पिण्यायोग्य राहत नाही म्हणजेच ते माणसाच्या  शरिरास आरोग्यदायी नसते. तसेच कलेचं  झालं असत. शेवटी कला हि समजाचा प्रतिबिंब आहे ती त्या-त्या समजाच  नेतृत्व करते असे म्हणणे काही खोटे ठरणार नाही. 

पण, कलेत झालेला बदल काही आजचा नाही तर तो कलेतील बदल हा प्राचीन काळापासूनच होत आला आहे. त्यामुळे, कलेचे मूळ जाणून घ्यायचे असेल तर एकच पुरावा म्हणून माझ्या लक्षात येते ते म्हणजे आपली वाड्मयीन सपंदा. यामध्ये आपल्याला आपल्या कलेविषयक प्रश्नांना जाणून घेण्यास मदत मिळते. कलेचा जन्म, त्याचा एकमेकांशी असलेला संबंध अशा मला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी यांची साथ मिळते.  

कला शब्दाविषयी-

कला हा शब्द संस्कृत  'कल' या धातू पासून आला आहे. म्हणजे, या शब्दाचा साधारणतः अर्थ सुन्दर, कोमल, मधुर किंवा सुख देणारी आणि अनुकूल अशी ती 'कला' असा घेतला जातो. कलेचे कालांतराने ललितकला आणि उपयोजित कला असे दोन भाग पडले आपण इथे ललित कलेतील चित्रकलेविषयी बोलणार आहोत.

भारतीय साहित्य-

 भारतीय संस्कृतीतील 'वेद' हे प्रथम लिखित पूरावा मानला गेलाय, तर आपण त्यापासूनच आपला श्रीगणेशा करूया. वैदिक साहित्याविषयी बघितले तर ऋग्वेदामध्ये असलेल्या काही 'ऋचा' मध्ये चित्रकलेविषयी उल्लेख आला आहे.  त्यानुसार, त्याकाळी चामड्यावर चित्र काढण्याची पद्धत होती. काही रुचानुसार उषा आणि रात्री या दोन्ही देवींच्या आकृती अंकित केल्या जायच्या असे कळून येते. 

आर्ट हब इंडिया प्रत
 

https://arthubindia.blogspot.com/2021/08/katha-vahananchi-stories-of-vahana.html 

आपण जर रामायण  वाचले तर गीत, नृत्य, वाद्य, चित्रकला इत्यादी ललित कलांचे विवरण रामायणात आलेले आपल्याला दिसते. रामाच्या राजप्रासादात भिंतीवर चित्रे होती (२/१५/३५). रावण हा कलेचा ज्ञाता होता हे त्याचे रामायणात आलेल्या एकदंरीत वर्णनावरून जाणवते. हनुमान जेव्हा सीतेच्या शोधात लंकेला गेला तेव्हा त्याला एक चित्रशाळा  आणि चित्रांनी सुसज्ज असे स्थान बघायला मिळाले. तसेच, रावणाने सीतेला भ्रमित करण्यासाठी 'विघ्ज्जीतर' नावाच्या चित्रकाराला रामाचा  चेहरा व त्याच्या धनुष्याचे चित्र बनविण्याचा आदेश दिला होता. (७/९९/७)रामायणातील  पुष्पक विमानाचे वर्णन हे प्रसिद्धच  आहे. त्याच वर्णनानुसार, रावणाच्या पुष्पक विमानामध्ये मनाला भुरळ पडणारे असे वेगवेगळे दृश्य अंकित होते असाहि उल्लेख रामायणात आला आहे.

 महाभारतामध्ये, 'सत्यवान' भिंतीवर घोड्याचे चित्र काढत असल्याने त्याला लहानपणी चित्राश्व नावाने ओळखले जायचे. (३/२९३/१३) रामायणाच्या तुलनेत यामध्ये अगदी कमी उल्लेख सापडतात. 

हरिवंशपुराणामध्ये एक स्त्री चित्रकार चा उल्लेख आला आहे. जिने विश्वातील सर्व नामवंत व्यक्तींचे चित्रण बनविले होते. हि बाणासुराची मुलगी 'उषा' हिची मैत्रीण होती असाही उल्लेख केला  आहे. अग्नि पुराण, मत्स्य पुराण, पदमपुराण या पुराणामध्ये कलेबद्दल उल्लेख आलेले दिसून येतात. 'चित्रलक्षण' हा महत्वाचा ग्रंथ आहे मात्र, याचे फक्त तीनच भाग अस्तित्वात असल्याचा उल्लेख सापडतो. हा ग्रंथ 'नग्नजित' किंवा 'भयजीत' यांनी लिहिलेला आहे. याचा काळ साधारणतः २-३ मानला जातो. हा ग्रंथ तीब्बतमध्ये तंजूर ग्रंथमाळेच्या अंतर्गत प्रकाशित केला गेला आहे. या ग्रंथामध्ये चित्रकलेच्या उत्त्पतीची कथा आलेली आहे. या कथेनुसार, मुत्यू पावलेल्या एक ब्राम्हण मुलाचे चित्र 'मयजीत' राजाने काढले आणि त्या चित्रात ब्रम्हदेवाने जीवन टाकले असता त्या क्षणी तो ब्राम्हण पुत्र जिवंत झाला.

भारतीय साहित्यामध्ये महत्वाचे मानल्या जाणाऱ्या पुराणाची संख्या १८ आहे आणि यांचे काही उपपुराणही आहेत. कलेसाठी किंवा चित्रकलेसाठी महत्वाचा मानला जाणारा ग्रंथ म्हणजे 'विष्णुधर्मोत्तर पुराण' हा होय. मात्र, याची गणना महापुराणात होत नाही.  कारण, हा विष्णू पुराणाचे उपपुराण मानल्या गेलेला आहे. भारतीय चित्रकलेबद्दल सविस्तर आणि स्पष्ट माहिती आपल्याला या पुराणामध्ये आलेली दिसून येते. या ग्रंथाच्या निर्मिती  काळाबद्दल मतभेद आहेत. या पुराणाच्या ३ ऱ्या खंडात चित्रकलेचे विवेचन आहे. या पुराणात एकूण ११८ अध्याय आहेत. ३५ व्या अध्यापासून ते ४३व्या अध्यायापर्यंत 'चित्रसूत्रम' नावाचे प्रकरण आले आहे. या ग्रथांच्या सुरुवातीला आलेल्या प्रसंगामध्ये, राजा वज्र याला चित्रकला शिकायची इच्छा असते हे तो मार्कण्डेय मुनींना सांगतो तर त्यावर मुनी त्याला त्याआधी नृत्य शिकण्यास सांगतात .
तसेच, यामध्ये आलेल्या एका प्रसंगानुसार, नारायण मुनींनी आंब्याच्या रसापासून रूपवान अश्या स्त्रीचे  चित्र काढले, नंतर ती स्त्री 'उर्वशी' नामक अप्सरा झाली. या कलेला नंतर त्यांनी विश्वकर्माला शिकविले आणि नंतर हि कला परंपरा पुढे सुरु राहिली. 

डॉ. मिनल राजूरकर 
https://arthubindia.blogspot.com/2021/08/devbhatk-ravan.html

व्याकरणाचार्य 'पाणिनी' ने अष्टाध्यायीमध्ये चारुशिल्पांतर्गत 'ललितकला' व 'उपयोगिक कला' याचे विश्लेषण केले आहे. अर्थशास्त्रामध्येही 'कारू' शब्द आलेला आहे. भरतमुनीचा 'नाट्यशास्त्र' हा ग्रंथ कलाक्षेत्रामध्ये प्रचलित ग्रथांपैकी एक आहे. यांचा ग्रंथ हा जरी नाट्य या कलेला समर्पित असा वाटत असला तरी नाट्य संबंधित असलेल्या प्रेक्षागृह व त्यावरील चित्रांकन करावयाची पद्धती सांगितली आहे. यामध्ये सांगितलेल्या रसनिर्मिती संकल्पनेचा संबध हा चित्रकलेशीहि आहे. म्हणजेच रसाचा  संबंध हा सर्व ललित कलेशी आहे असा अर्थ इथे आहे. 
११ व्या  शतकातील परमार भोज ने रचलेला वास्तुकलावरील ग्रंथ 'समरांगण सूत्रधार' हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. याग्रंथामध्ये मूर्तीरचनेच्या मधे मधे     चित्ररचनाविधीची पण व्याख्या दिलेली आहे. 

कल्याणचा चालुक्यवंशी राजा विक्रमादित्य द्वितियचा मुलगा सोमेश्वर याने ११३१ ई .स. मध्ये ' अभिलाषितार्थ चिंतामणी' नामक एक विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला. यालाच 'मानसोल्लास' असेहि नाव आहे. याच्या तिसऱ्या विशन्तिच्या पहिल्या अध्यायात चित्रकलेवर वस्त्र विचार केला आहे, ज्यात चित्रकार स्वरूप, चित्रभित्ती, लेखणी-लेखन, शुध्दवर्ण, मिश्रवर्ण, चित्रवर्ण अश्या काही काही बाबीची मीमांसा केलेली आहे.

कालिदासाचे नाटक मालविकाग्निमित्रम ची नायिका मालविकाच्या मनमोहक चित्राला पाहून  राजा अग्निमित्र इतका प्रभावित होतो कि, त्याची हि आसक्ती प्राण्यात बदलते. 'मेघदूत' तसेच 'रघूवंशम' मध्ये चित्रकजेलचे सुन्दर सदंर्भ आहेत. याच्या त्या काळातील वर्णनावरून असे लाखात येते कि, स्त्री-पुरुष दिघेंही चित्रकर्म करत होते. 

विशाखदत्त याने रचलेला 'मुद्राराक्षस' मध्ये यमराजाच्या चित्राचा उल्लेख आहे.

 बाणभट्ट यांनी लिहिलेल्या कादंबरी यामध्ये चित्रकलेच्या संदर्भात सुन्दर उल्लेख आलेला आहे. यामध्ये पाच शुद्ध वर्णांचा उल्लेख असून त्याबरोबर व्रणचित्र, भावचित्र व रेखाचित्र याची पण माहिती आलेली आहे. पंचदशी हे सायनाचार्यचे भाऊ माधव यांनी लिहिले आहे. पंचदशीया ग्रंथातील चित्रदीप नामक ६व्या प्रकरणामध्ये चित्रशास्त्राच्या बाबतीत सविस्तर माहिती मांडली  आहे. 

गुप्तकालीन  आचार्य वात्सायन निर्मित कामसूत्र हा केलेच्या सौंदर्यशास्त्र दृष्टिने महत्वाचा पुरावा आहे. याच ग्रंथा च्या ३ ऱ्या अध्यायामध्ये ६४ कलांचा  उल्लेख आलेला असून यशोधरचा जयमंगला हा ग्रंथ यावरील पहिला टीकात्मक ग्रंथ म्हणून मानला गेलाय आणि याचमध्ये चित्रकलेचे  षडांग हि सांगितलेले आहे. हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्माच्या ग्रंथातही चित्रकलेचे उल्लेख सापडतात. श्वेतांबर जैनांनी एक ग्रंथ 'प्रश्नव्याकरणसुत्र'  मध्ये  चित्राची अनेक श्रेणी सांगितलेली आहे. बौद्ध पिटक,जातक, गाथांशी संबंधित अनेक ग्रंथामध्ये चित्रकलेचा उल्लेख मिळतो. 'विनयपिटक'मधील एक प्रसंगामध्ये कोशलराज प्रसेनजितच्या बगीचाच्या एका भागामध्ये चित्र संग्रहालयाच्या स्थापनेचे, तसेच चित्रित राजमहालाचे वर्णन मिळते. 

वरील विवेचनावरून आपल्या असे लक्षात येते कि, भारतीय प्राचीन साहित्यसंपदा हि किती मोठी होती आणि त्याचा रचना काळही हा खूप मोठा होता. तरीही साहित्य किंवा ग्रंथ रचनाकार कोणत्याही विषयाशी संबंधित ग्रंथ लिहीत असला तरी त्याला चित्रकलेचे ज्ञान होते. इथेच कळून येते कि, कलाकाराला सर्व केलेचे ज्ञान असणे आवश्यक असते. तसेच प्रात्यक्षिक स्वरुपामध्ये बघायचे झाले तर, चित्रे जर  भिंतीवर काढण्यात आली तर  ते भित्तीचित्र हे वस्तूचा भाग बनले, चित्र जेव्हा नाटकाच्या पार्श्वभागावर पडद्यावर काढून लावण्यात आले तेव्हाते नाटकाचा किंवा नैपथ्याचा भाग बनले. म्हणजेच हे एकमेकांशी संबंधित आहे त्यामुळे एक उत्तम कलाकाराला वा साहित्यकाराला या कलाचे  ज्ञान असणे साहजिकच आहे. 

दुसरे म्हणजे, भारतीय साहित्यामध्ये कलेवर इतक्या बारकाईने विचार केलेला जाणवतो कि, आजही त्यांनी सांगितलेल्या चित्रकलेच्या आधारस्तंभावरच चित्रकलेचा आधुनिक डोलारा सांभाळला आपल्याला नक्कीच जाणवेल.  कलेमध्ये कितीही बदल झाले तरी 'जुनं ते सोनं' या म्हणीप्रमाणे  आपण आपल्या कला साहित्याला जपणे आवश्यक  आहे. 

डॉ. मिनल राजूरकर 

https://www.youtube.com/watch?v=ErazHRtsLVw

 

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

कथा वाहनांची- Katha Vahananchi- Stories of Vahana

                            कथा वाहनांची

'वाहन' हि  खूप सुदंर  संकल्पना  आहे. आपल्याला एका  ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आरामात आणि जलद जायचे असेल तर आपण साधारणतः वाहनांचा  उपयोग करतो. आधुनिक काळामध्ये जी वाहनांची संकल्पना बघतो ती फार प्राचीन आहे. आज आपण आपल्या आर्थिकतेनुसार वाहनांची निवड करतो पण याची मूळ संकल्पना अशी होती कि, वाहनाच्या लक्षणावरून त्या-त्या वाहनांना निवडल्या जायचे. वाहन हि संकल्पना पुराणामध्ये जास्तच रूढ असलेली दिसून येते आणि  तेथूनच  साधारणतः देवलोकापासून त्याची सुरुवात झाली असे म्हणूयात जेणेकरून ते समजून घेण्यासाठी सहज होईल . 

देवांच्या वाहनांची वर्णने पुराणामध्ये मिळतात. 'वाह' या संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजे 'वाहून नेणे' असा होतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या मार्गाचा म्हणजे साधारणतः जलमार्ग, स्थलमार्ग आणि आकाशमार्ग यांचा उपयोग केला जातो त्यासाठी जी साधने वापरण्यात येते त्याला आपण वाहने म्हणू  शकतो. मानवाच्या पशुपालन अवस्थेबरोबर पशूंना वाहने म्हणून वापरण्याचा प्रघात असल्याचा  आढळून येतो. पूर्वी मनुष्य हा प्राण्यांच्या पाठीवर बसून स्थलांतर करत असे. आजही राजस्थान मध्ये उंटावर बसून, हिमाचल सारख्या ठिकाणी  याक वर बसून वाहन म्हणून हि प्रथा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कालांतराने प्राण्यांना रथाला, बैलगाडीला म्हणजेच इतर साधनांना ओढण्यासाठी वापरण्यात येऊ लागले. 

पुराणाविषयी बोलायचे झाले तर, देवी देवतांची वाहने हा एक दैवतशास्त्राचा  भाग आहे. कारण, आपल्याला मनुष्य, राक्षस व प्रेत यांचीही वाहने या प्रकारात गणना केलेली दिसून येते. आपल्याला कलेमध्ये वाहनाव्दारे देवतांची ओळख होण्यास मदत होते. प्राण्याच्या गुण-वैशिष्ट्यानं लक्षात घेऊन  कलाकाराने  देवतांशी त्यांचा संबंध केलेला  आणि त्याचे मूर्तीकरण केलेले दिसून येते. उदाहरण बघायचे झाले तर सिंह हा सर्वात शक्तिशाली आहे आणि याचा वाहन म्हणून संबंध हा दुर्गा देवीशी लावण्यात आला आहे. त्यामुळे एक प्रतीकात्मक अर्थ हि यातून उत्पन्न होतो. म्हणजे सिंहामुळे देवीचा  हि शक्तिशाली असण्याचा संबंध इथे जोडला गेला आहे असे कळून येते. मग हि प्रतीकात्मकता कालबद्ध नसते. 

भारतीय शिल्पकला, चित्रकला, साहित्य यावरून असे लक्षात येते कि,  वाहने  हि दोन प्रकारांमध्ये विभागल्या जाऊ शकतात. १)  मूळ रूपात   २) मिश्रित रूपात 

१)  मूळ रूपात- यामध्ये प्राण्याची  चित्रणे  किंवा वर्णने हि त्याच्या नैसर्गिक रुपाचे केले असते आणि त्यामुळे त्याच्या गुणांचाही संबंध हा मूळ रुपाशीच अपेक्षित असतो. 

https://arthubindia.blogspot.com/2021/08/devbhatk-ravan.html

२) मिश्रित रूपात - यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे एकत्रीकरण करून मिश्रित स्वरूपात आलेले दिसून येते. यामध्ये आणखी दोन प्रकार केल्या जाऊ शकतात ती म्हणजे दोन प्राण्यांचे एकत्रीकरण  आणि  दोन पेक्षा जास्त प्राण्यांचे एकत्रीकरण. असे करण्याचा उद्देश साधारणपणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या गुणांचे एकत्रीकरण असा असू शकतो. 

दोन प्राण्यांचे एकत्रीकरण याचे उदाहरण द्यायचे झाले तर मनुष्याचे शरीर आणि प्राण्यांचा चेहरा.  दोन पेक्षा जास्त प्राण्यांचे एकत्रीकरण हा प्रकार फारच क्वचित दिसून येतो. 

 आपण आता देवतांच्या वाहनाविषयी जाणून घेऊयात. 

अश्व हा सर्वात प्राचीन प्राणी आहे जो आजपर्यंत वाहन या स्वरूपात उपयोगात आणल्या जातो. याच्या निर्मितीचे काही कथारूपामध्ये उल्लेख आलेले दिसून येतात त्यापैकी- उचै :श्रया नामक अश्वाची उप्तत्ती हि समुद्रमंथातून झाली त्यामुळे हा सर्वात पहिला अश्व मानला गेला असून इतर अश्वांची निर्मिती हि याच्या पासून झाली असे मानल्या गेले. विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये सूर्याच्या रथाचे सप्त अश्व हे सात छन्द यांचे आणि चन्द्राचे दहा अश्व हे दहा दिशांचे प्रतीक सांगितले आहेत. कलेमध्ये अश्वाचे नैसर्गिक रुपमध्येच चित्रण दिसून येते. मात्र दक्ष याचे काही ठिकाणी चित्रण हे अश्वाचे मुख आणि मानवाचे शरीर या रूपामध्ये दिसून येते. तुंबरू हे एक गन्धर्व आहेत त्याचे देखील चित्रण अश्याच मिश्रित प्रकारात केले असते. मात्र या दोघांमध्ये फरक ओळखण्यासाठी तुंबरूच्या हाती एक वाद्य असते. कारण त्यांचा संबंध संगीताशी आहे.

कूर्म म्हणजे कासव हा जमिनीवर राहणार आणि पाण्यामध्ये राहणार असल्याने याचा संबंध हा दोन्ही प्रकारामध्ये लावण्यात आला आहे. कूर्म हा वैदिक प्रतीक होता जो द्युलोक आणि पृथ्वी दोहोंचा सूचक होता.  कालांतराने हा श्रीलक्ष्मीशी आणि यमुनेशी वाहन रूपात दिसून आला. याचे मंदिरामध्ये देखील गाभार्याच्या बाहेर शिल्प असते. समुद्रमंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर याने पर्वताचा भार संभाळल्याने तेथे दाखविण्याची प्रथा आहे. 


गरुड हा विष्णूचे वाहन आहे. याचे शिल्प मानव रूपामध्ये दाखवितांना काही वेळा चेहरा गरुडाचा, शरीर मानवाचे, आणि पाठीला पंख दाखविले जातात. हा विष्णूच्या शेजारी हात जोडून उभा असलेला किंवा यावर विष्णू स्वर असलेले कलेमध्ये आपल्याला बघायला मिळते. गरुड हा पक्षिश्रेष्ठ कश्यप व विनता चा मुलगा होता आणि याने जन्मल्याबरोबर गगनभरारी घेतल्याने पक्ष्यांचा इंद्र हे नाम मिळाले.

नंदी हे शिवाचे वाहन म्हणून प्रसिद्ध आहे. शिव हा वृषभवाहन आणि वृषभध्वज बनण्याची कथा महाभारतात आली आहे. नंदी म्हणजे वृषभ म्हणजे बैल असा अर्थ आहे. पुराणामध्ये शिलादमुनींचा पुत्र सांगितलं आहे. वृष याचा एक अर्थ वर्षाव करणारा आणि दुसरा म्हणजे अत्यधिक प्रजनन शक्तीनेयुक्त असा होतो. कालांतराने रुद्राचा संबंध शिवाशी एकात्म आल्याने वृषभ म्हणजे अत्याधिक प्रजननशक्ती युक्त याच विशेषणाने मानल्या जाऊ लागला. हा गरुडाप्रमाणे दोन्ही रूपात दाखविला जातो. दक्षिणेस नदिश मूर्तीची पूजा केली जाते. शिवाच्या गाभाऱ्यासमोर याचे प्राणिरूपात शिल्प असते. शिवाचा आणि नंदीचा संबंध इतका दृढ झाला आहे कि, नंदी ची पूजा हि शिव पूजा केल्याप्रमाणे मानल्या जाते आणि आपल्याला शिवचरणी करावयाची प्रार्थना शिवपर्यंत पोहचविण्याची विनंती नंदी च्या कानामध्ये सांगितल्याने पूर्ण होते अशीही मान्यता आहे. 

मग र हा जलचर प्राणी आणि भुचर प्राणी आहे. रामायणामध्ये आलेल्या कथेनुसार हनुमानाला एका मगरीने खाल्ले ज्यामुळे तिला एक पुत्र जन्माला आला ज्याचे नाव 'मकरध्वज' होते. मगर हा पाण्याशी संबधित शक्तिशाली असल्याने त्याला अग्निपुराणामध्ये वृन्दास वाहन सांगितले आहे. तर विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार मकर हे गंगेचे वाहन सांगितले आहे. जेव्हा गंगा हि मग रावर आरूढ असलेली दाखविली जाते तेव्हा तिचे नाव मकरवाहिनी असे घेतल्या जाते. कालांतराने हेच तिचे वाहन रूढ झाले आणि क्लेमध्येही मकर हेच तिचे वाहन दिसून येते. मकर हे नैसर्गिक रूपामध्ये दाखविलेले असते. 


 https://arthubindia.blogspot.com/2021/06/shiveche-roop-hari-har-murti-hari-har.html

मोर या पक्ष्याचा वाहन म्हणून कार्तिकेयशी संबंध दाखविला आहे. कार्तिकेय हा युद्ध देवता मानला गेला आहे. 'मूषक' म्हणजे उंदीर हे गणपतीचे 'वाहन' म्हणून प्रसिद्ध आहे. 

 'मूंगूस' हा कुबेराचे वाहन सांगितलं आहे. याची पुराणकथा अशी कि मूंगूस आणि सापाचे वैर आहे. सापाच्या डोक्यावर मनी असतो आणि मूंगूस (नेवला) हा सापाला खातो त्यामुळे सापाच्या डोक्यावरील सर्व मनी हे मूंगूसच्या  पोटामध्ये असतात. त्यामुळे तो धनी असतो आणि कुबेर हा धनिक आहे या दोहोंचा संबंध म्हणून कुबेराच्या जवळ किंवा हाती मूंगूस असतो. 

'क्रौच' नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत वावरत असताना त्याची लाथ सौभ्रि ऋषीला लागली तेव्हा त्याला रंगात मूषक होण्याचा शाप दिला व तो मूषक बनून पराशराच्या आश्रमात आला व आश्रमात पदार्थ खाऊन पराशराला त्रास दिला तेव्हा पराशराने गणेशाची प्रार्थना केली गणेश प्रगटले व उंदरावर पाश टाकला व उंदीर शरण आला. प्रसन्न होऊन गणपतीने त्यास वर मागण्यास सांगितले पण उंदरानेच गणेशाला वर मागितला तेव्हा गणेशाचे त्याने वाहन व्हावे असे असे म्हटले तेव्हापासून 'मूषक' हे गणेशाचे वाहन बनले. 


 

हत्ती हे वैभवाचे प्रतीक मानले जाते. त्यांचा सबंध हा लक्ष्मीशी दाखविला गेला आहे. समुद्रमंथनातून निघालेल्या रत्नांपैकी ऐरावत हत्ती हा एक रत्न होता आणि त्याला इंद्राने आपले वाहन बनविले. हरिण हा चन्द्राचे वाहन असून शिवाला देखील मृगधर म्हटले आहे. हंस हा सरस्वतीचे वाहन सांगितलेला आहे . तसेच, हा सन्यासाचे प्रतीक मानले जाते. नळ-दमयंती च्या मिलन घडवून आणण्याकरिता  शिवाचा हंस अवतार घेतल्याचे सांगितले आहे. 

वरील जी काही आपण वाहने बघितली ती आपल्याला सहज कलेमध्ये किंवा आपल्या ऐकण्यात अशी होती त्याबद्दल आपण जाणून घेतले. अश्याच प्रकारचे कितीतरी प्राणी वाहने आहेत जी खूप रहस्यमय कथांनी वाहन रूपात आलेली आहेत. जसे, रेडा, मनुष्य, मांजर, गंध, गिधाड आदी. 

वरील विवेचनावरून आपल्याला असे दिसून येते ते म्हणजे या कथा प्राण्याच्या उत्पत्ती बरोबरच त्याच महात्म्य वाढविण्याच्या दृष्टीने देखील आल्या आहेत.  या प्राण्यांच्या देविकतेमुळे पौराणिक कथांमध्ये नावीन्यत्व जाणवते. या वाहनाचे भारतीय समाजांमध्ये इतके महत्व आहे कि, वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्यात, व्यावसायिक ठिकाणी देवतांची मूर्ती न ठेवता त्याचे प्रतीकरूप किंवा त्या देवताचे अस्तित्व म्हणून त्यानंची वाहने ठेवली जातात. काहींची अशी मान्यता अशी आहे हि याना पुजल्याशिवाय त्या देवतांचे पूजन हे त्या देवतेस मान्य नसते. उदाहरणार्थ गणेशाच्या आधी मूषक पूजन, शिवाच्या आधी नंदी पूजन करणे हे महत्वाचे मानले जाते. आपल्या पौराणिक कथा या आपल्या पिढी अन पिढी आपल्या मनावर आपसूकच प्रभाव सोडून गेल्यात आणि आपण त्याला आपल्या जीवनाचा भागही केले. 

डॉ. मिनल राजूरकर 

 

 https://www.youtube.com/watch?v=Yl-zC42hduQ

 

 



 











                                                        


शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

देवभक्त रावण (Devbhatk Ravan)

देवभक्त रावण (Devbhatk Ravan)

वाल्मिकी रचित रामायणामध्ये 'रावण' हे नाव आपल्याला आलेलं दिसत राम  हा मर्यादापुरुषोत्तम म्हणून या साहित्यामध्ये आला तर, त्या विरुद्ध अवगुणांनीयुक्त रावण साकारलेला आहे. आजही त्याच्या त्या गुणांना लक्षात घेऊन दसरा (विजयादशमी)  या सणाच्या दिवशी 'रावण दहन' केल्या जाते. अवगुणांचा प्रतीक असा रावण कायम आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेला जाणवतो. समाजाच्या मनावर बिंबविल्या गेलेल्या साहित्य कथांसोबत  कलेचीही भर पडली. कलेमध्ये रावणाच्या अवगुणांना प्रदर्शित करणाऱ्या कथाच जास्त तर दिसून येतात. भारतीय लघुचित्रकला शैली मध्ये रामायणातील प्रसंग चित्रित केलेली आहेत त्यामध्ये रावणाचे चित्रण आपण बघू शकतो. त्याचबरोबर भारतीय शिल्पांमध्ये देखील प्रासंगिक कलेमध्ये याचे शिल्प दिसते. 

मात्र, रामायणामध्ये आणि इतर पुराणांमध्ये आलेल्या रावण वर्णनावरून रावणाच्या गुणांचा दुसरा पैलू आपण बघू शकतो. रावण हा विश्रवा आणि कैकसीचा मुलगा आणि कुबेर याचा सावत्र भाऊ होता. रावण जन्मकथा थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या पद्धतीने आलेल्या पुराण साहित्यामध्ये दिसून येतात. 

 

रावण सीता अपहरण (गुगल प्रत )
https://arthubindia.blogspot.com/2021/07/badami-guhetil-kala.html

रावणाचा जन्म-

महाभारतातील वनपर्व यानुसार

ब्रम्हाजीचा 'पुलस्त्य' नावाचा  एक मानस पुत्र होता. तो महाज्ञानी, तपस्वी होता. त्याच्या  पत्नीचे नाव 'गौ' होते आणि या दोघांना 'वैश्रवण' म्हणजेच कुबेर हा मुलगा झाला. वैश्रवण हा आपल्या माता-पिताच्या सेवेपेक्षा पितामह ब्रम्हाची जास्त सेवा करत असे. वैश्रवणचे हे वागणे पुलस्त्यच्या क्रोधाचे कारण बनले आणि पुलस्त्यने कठोर तप करून स्वतःच्याच शरीराला दुसऱ्या शरीरामध्ये प्रगट केले. अश्याप्रकारे अर्धशरीर रूपांतरित असलेल्या मुलाचे नाव 'विश्रवा' प्रसिद्ध झाले.    

कुबेराच्या लक्षात आले कि, आपले वडील विश्रवा आपल्यावर रागवले आहेत. त्यामुळे त्याने त्याचा राग घालवण्यासाठी अतिशय  सुदंर अशा नाच-गाण्यात निपुण असलेल्या  तीन राक्षस कन्या पुष्पोतक्टा, राका आणि मालिनी यांना विश्रवाच्या सेवेत नेमले. या तिघींच्या सेवेने प्रसन्न होऊन विश्रवाने त्यांना लोकपाल सारख्या पराक्रमी पुत्राचे वर दिले. त्यानुसार, पुष्पोतक्टाला 'रावण' आणि 'कुंभकर्ण' असे दोन पुत्र झाले. मालिनीला जो पुत्र झाला त्याचे नाव 'विभीषण' होते तर राकाला 'खर' नामक पुत्र आणि 'शूर्पणखा' नामक पुत्री झाली. रावण हा जेष्ठ आणि दहा तोंड असलेला, उत्साही, बलिष्ठ, पराक्रमी असा होता. 

रावण जन्माची दुसरी कथा म्हणजे रामायणनुसार

 पुलस्त्य ज्या प्रजातीचे पुत्र होते ते तपश्चर्या करण्यासाठी मेरुपर्वतच्या जवळ असलेल्या मुनिश्रेष्ठ तृणबिंदूच्या आश्रमामध्ये राहू लागले. तेथील अतिशय रमणीय वातावरण असल्याने ऋषिकन्या, नागकन्या, राजकन्या, अप्सरा या तेथे क्रीडा करण्यास येईहळूहळू त्या कन्यांचे नाच-गाणे हे पुलस्त्य ऋषी यांच्या तपश्चर्या भंगाचे कारण बनू लागले.  त्यामुळे एके दिवशी असह्य  होऊन पुलस्त्य ऋषीने  रागामध्ये म्हटले कि, "जी कन्या माझ्या डोळ्यासमोर येईल ती लगेच तिथे गर्भवती होईल." 

अश्या वचनांनी त्या कन्या घाबरल्या आणि तेथून निघून गेल्या मात्र, तृणबिंदू  यांची कन्या हिला  या ऋषी वचनाबद्दल काहीच माहिती नसल्याने ती पुलस्त्य ऋषी करीत असलेल्या वेदपठण ध्वनी ऐकून त्याच्याकडे वेद ऐकण्यास जाते आणि पुलस्त्य ऋषीच्या त्या  प्रभावाने  त्वरित तिथेच गर्भवती होतेती आपल्या शरीरात झालेला बदल बघून घाबरते आणि आपले  पिता मुनिश्रेष्ठ तृणबिंदूकडे जाते. तिच्या या अवस्थेचे कारण ती त्यांना विचारते तेव्हा ते आपल्या दिव्य दृष्टीने झालेला सगळा  प्रकार जाणून घेतात आणि तिलाहि सांगतात. यावर ती खूप दुःखी होते.  

तेव्हा, तिचे पिता तृणबिंदू श्राप घालविण्यासाठी पुलस्त्य ऋषीला तिचा स्वीकार करण्याची विनंती करतात आणि पुलस्त्य ऋषी ती  मान्य  करतात.  पुलस्त्य ऋषी नंतर तिच्या सेवेने  प्रसन्न होऊन तिला वर देतात कि, तिचा पूत्र हा 'पौलस्त्य' नावाने प्रसिद्ध होणार तसेच तो दोन्ही वंशाला वाढविणारा असेल. वेदध्वनी ऐकून गर्भधारण झाल्याने त्याचे नाव 'विश्रवा' असेल.  विश्रवा हा देखील आपल्या वडिलांप्रमाणे तपस्वी होता त्याचे लग्न मुनी भारव्दाजची कन्या देववर्णी हिच्याशी झाला. यांच्या मुलाचे नाव पुलस्त्य ऋषींनी 'वैश्रवण' नाव ठेवले.  वैश्रवणयाने पुढे एक हजार वर्ष ब्रम्हाजीची तपश्चर्या करून चौथा लोकपाल व धनाढ्य होण्याचा वर मिळविला. त्यामुळे त्याचे नाव कुबेर झाले आणि तो लंका येथे निवास करू लागला. 

त्यानंतर राक्षस राजा सुमालीची मुलगी कैकसी आपल्या पित्याच्या आज्ञेवरून विश्रवामुनीना भेटते. तेव्हा ते सायंकाळचे अग्निहोत्र करत असतात. कैकसीला बघून विश्रवा आपल्या दिव्य ध्यानदृष्टीने सगळं जाणून घेतात. कैकसी त्यांच्याशी विवाह करून कुबेर प्रमाणे तेजस्वी पुत्र प्राप्तीची इच्छा व वडिलांची आज्ञा त्यांना कळते. विश्रवा ती दारुण संयमी असल्याने  तिला क्रूरकर्मी पुत्रप्राप्ती होण्याचे  सांगितले. यावर कैकसीने विनंती केल्यावर त्यांच्या  (विश्रवा) वर्षानुरूप दुसरा धर्मात्मा पुत्राचे वर देतात. कालांतराने पूढे कैकसीला भयंकर दहा तोंड, वीस हात, मोठया दातांचा, लाला ओठ, वर्ण ने काळा आणि फडाच्या आकाराप्रमाणे विशाल असा पुत्र होतो. याच्या जन्माने सृष्टीमध्ये विचित्र बदल झाला, देवता रक्तवर्षा  करू लागले, पृथ्वी हलू लागली आदी. हा पुत्र दहा  तोंडाचा असल्याने त्याच्या वडिलाने त्याचे नाव 'दशग्निव' ठेवले. त्यानंतर कुंभकर्ण नावाचा मुलगा, 'शूर्पणखा' नावाची मुलगी  आणि नंतर 'विभीषण' मुलगा जन्माला आला. 

रामायणामध्ये सांगितलेली हि कथा अग्नीपुराणातील कथेशी समरस आहे. रावणाच्या रुपामुळे रावण तिन्ही लोकामध्ये जसा प्रसिद्ध होता तसाच तो त्याच्या निस्सीम भक्तीसाठी देखील प्रसिद्ध होता. त्याने ऐच्छिक वर मिळविण्यासाठी कठोर अशी हजारो वर्षे तपश्चर्या केली.


दशाननाला  शिवाचा  तपाने मिळालेले 'रावण' हे नाव -

रावणाने कुबेराशी युद्ध करून त्याच्याकडील पुष्पक विमान बळकावले . एकदा त्याच पुष्पक विमानाने तो कार्तिकच्या उत्पत्ती स्थान, सरहरींच्या जगलामध्ये गेला. तेथून जात असताना कैलास पर्वतावर  त्याच्या विमानाची गती थांबली. रावण याबद्दल विचार करतो न करतो  तेव्हा अति आक्राळ  रूपाचा, काळ्या-पिवळ्या रंगाचा, स्थूल असा चेहरा वानराप्रमाणे असेलला नंदी तेथे येतो. तो रावणाला शिव कैलास पर्वतावर क्रीडा करत असल्याने तेथे कोणाचाही प्रवेश नसल्याचे सांगतो. नंदीच्या या वचनांचा रावणालाही खूप राग येतो, त्याचे डोळे रागाने लाल होतात आणि तो पुष्पक विमानातून खाली उतरतो आणि नंदीच्या त्या विचित्र रूपाचा रावण उपहास करतो, त्यावर रागवून  नंदी वानर आपल्या नखांना, दातांना आयुध बनवून तुझ्यावर मात करतील असा शाप देतो. 

रावणाच्या मनात शिव आणि नंदी या दोघांविषयी या सर्व प्रकारांचा राग पराकोटीला जातो आणि तो शिवाला स्वतःचे बळ दाखविचे  तसेच  कैलास पर्वताला आपल्या लंकेस नेण्याचे ठरवितो. त्यासाठी दशानन  लगेच कैलास पर्वताला उचलण्यासाठी आपले हात पर्वताच्या खाली घालतो  आणि पर्वत उचलु लागतो. त्यामुळे पर्वतावरील सर्व शिवगण घाबरतात, पार्वती देखील घाबरून शिवाला आलिंगन करते. 

 

रावण कैलास पर्वत उचलताना  

हा सर्व प्रकार बघून शिव मात्र शांत असतात. ते  बसलेल्या अवस्थेतच आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वताला दाबतात आणि तसे करताच दशांननाचे हात जे पर्वत उचलत असतात ते त्या पर्वताखाली दाबले जातात, तसाच रावण जोरदार ओरडतो. त्याच्या ओरडण्याने तिन्हीलोक घाबरतात. सगळीकडे महाभयंकर वातावरण जाणवू लागते , इंद्रादी देव हि हे सर्व बघत असतात. हा सर्व प्रकार बघून दशांचे मंत्री त्याला शिवाला प्रसन्न केल्याशिवाय यावर कोणताही उपाय नसल्याचे सांगतात. 

तेव्हा दशानन शिवाला मनामध्ये प्रणाम  करतो आणि सामवेदच्या विविध मंत्रानि तो शिवाची स्तुती गाऊ लागतो. एक हजार वर्षांनी शिव त्यावर प्रसन्न होऊन त्याचे हात पर्वताखालून मुक्त करतात. दशाननाच्या चित्काराने  तिन्ही लोक घाबरल्याने शिवाने त्याला 'रावण'  हे नाव प्रदान केले. म्हणजेच, देवता, मनुष्य, यक्ष तसेच पृथ्वीवर असलेले लोक बाकी त्याला लोकांना  रडविणारा म्हणजे 'रावण' असे संबोधतील, असे शिव म्हणाले. त्याचबरोबर रावणाच्या म्हणण्यावरून शिवाने त्याला त्यावेळी चंद्रहास नामक तलवार  आणि त्याचे उर्वरित आयुष्य हे कोणत्याही कर्माने नष्ट न होण्याचे  वरदान दिले.

तसेच, त्याच्या शिव भक्तीचे  आणखी एक प्रमाण म्हणून आलेली  कथा अशी कि, रावणाची आई कैकसीने रावणाला शिवाकडे लिंग आणण्यास पाठविले असता, रावणाने  कैलासावर  जाऊन शिवाला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या शरीराच्या विभिन्न भागाने विना मानक वाद्य तयार केले ते असे-डोक्याने वीणेचा मूळ भाग बनवून आपल्या शरीराने त्याचा पृष्ठभाग बनविला. पायांनी त्या विनाचा अग्रभाग बनविला, बोटांनी त्याच्या खुंट्या आणि पोटाच्या आतड्यापासून शेकडो व हजारो तारा बनविल्या. हे झाल्यावर त्याने त्यासोबत गंधर्व प्रमाणे गायन केले. त्यानंतर  शिव ने नंदीला त्याचे डोके जोडण्यास  सांगितले आणि त्याला अश्या राक्षसास आत्मलींग देण्यास नकार कळविला. रावणने मात्र आपले तो क्रम  चालूच ठेवला. शेवटी दहा दिवस झाल्यावर शिवाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितला तेव्हा त्याने आपल्या मातेसाठी  आत्मलींग आणि पत्नी म्हणून पार्वतीस मागितले. तेव्हा शिवाने या वरदाना बरोबरच त्याने दहा दिवस स्वतःचे डोके तलवारीने कापून अपर्ण केल्याने त्याला दहा डोके आणि वीस हात असण्याचाही वर दिला. 

पुढे त्याच्या या वरामधून  विष्णू  पार्वतीला नेतो आणि आत्मलींग हे समुद्र किनारी गोकर्णला स्थापित होते. त्यामुळे माता कैकसी हि त्याच्यावर रुष्ट होते. त्यानंतर..... 

 

शिव रावणानुग्रह (गुगल प्रत ) 
 https://arthubindia.blogspot.com/2021/06/normal-0-false-false-false-en-in-x-none.html

रावणाचा ब्रम्ह तप-

वैश्रवण (कुबेर)  एकदा आपल्या पुष्पक विमानामध्ये बसून आपल्या वडिल विश्रवाला भेटायला आले असता त्याचे तेज पाहून कैकसी आपला पुत्र दशग्रीव (रावण) यास वैश्रवणप्रमाणे तेजस्वी बनण्यास प्रेरित करते. त्यानुसार, दशग्रीवने गोकर्णाश्रम मध्ये दहाहजार वर्षापर्यत तप करतो. ब्रम्हाला लवकर प्रसन्न करण्यासाठी तो आपल्या दहा डोक्यांची आहुती देण्याचे ठरवितो  आणि तो प्रत्येक एक हजार वर्ष झाले कि स्वतःच्या एक मुखाची आहुती देतो. याप्रमाणे दशग्रीव आपल्या नऊ डोक्याची आहुती नऊ हजार वर्ष देतो आणि जेव्हा दहा हजार वर्ष पूर्ण झाल्यावर आपले शेवटचे डोके तो कापून आहुतीमध्ये अर्पण करत असतो तेव्हाच ब्रम्हा त्याचा समोर प्रकट होतात आणि त्याला त्याचा ऐच्छिक वर देतात. ज्यामध्ये मनुष्या व्यतिरिक्त गरुड, सर्प, यक्ष, दैत्य, दानव, राक्षस आणि देवता याने रावण अवध्य असेल. त्याचप्रमाणे ब्रम्हाजीने त्याने आहुती दिलेली सर्व डोकी हि पुन्हा त्याला परत केली.

 कौटुंबिक रावण-

रावण जरी इतरांसाठी दुष्ट आणि भयावह असला तरी तो आपल्या कुटुंबाविषयी  भावुक आणि जबाबदार असा होता. त्याने आपल्या बहिणीचे म्हणजे शुर्पणखाचे लग्न कालकेयवंशी दानवेन्द्र विद्युजितच्या सोबत केले. एकदा रावण शिकारीला गेला असता त्याला मय आणि त्याची कन्या हे दोघे भेटले, रावणाच्या विचारण्यावरून मय ने स्वत:चा व त्याच्या मुलीचा परिचय त्याला दिला तो असा- मय हा दितीपुत्र होता इंद्राला शची तर त्याला हेमा नावाची अप्सरा देवांनी त्याला दिली होती, पण ती जेव्हा देवांच्या कार्यासाठी देवलोक गेली तेव्हा तो तिच्या विरहामध्ये  चौदा वर्ष त्याच्या पुरीमध्ये राहिला आणि तेथूनच त्या मुलीला घेऊन तो आता तिच्या लग्नासाठी वर शोधण्यास निघाला. हि मय आणि अप्सरा  हेमाची पुत्री असून तिचे नाव मंदोदरी आहे. त्यावर रावनानेही आपला परिचय देऊन मयच्या संमतीने  मंदोदरीचे पाणिग्रहण केले. मयने या वेळी त्याला एक अघोर शक्ती दिली ज्या शक्तीने त्याने वेळेप्रसंगी  लक्ष्मणवर प्रहार केला होता. 

नंतर त्यानंतर त्याने, वैचारणची पुत्री म्हणजे वज्रज्वाला हिच्याशी आपला भाऊ कुंभकर्णचा विवाह, गन्धर्वराज शैलुश पुत्री सरमाचा  विवाह विभीषणशी  केला. रावण आणि मंदोदरी चा पुत्र मेघनाद किंवा इंद्रजित होता. 

रावणाची कलात्मकता- 

त्रिकुट पर्वतावर विश्वकर्मा ने राक्षसांना राहण्यासाठी लंका नामक पुरी बनविली होती, मात्र राक्षस विष्णूच्या भीतीमुळे पाताळात राहू लागल्याने लंका सारखी सुदंर पुरी जी यंत्र, शस्त्र, सोने, हिरे अर्थात सर्व अद्भुत गोष्टीनी संपूर्ण  होती, अश्या नगरीचा आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून कुबेर हा अधिपती झाला. मात्र, रावणाने नंतर ती हस्तगत केली आणि तो तिथला अधिपती झाला. तेथील सुंदरतेचे  वर्णन सीतेच्या शोधात लंकेला गेलेल्या हनुमानाने केले आहे. त्यांच्यानुसार, श्वेत रंगानी युक्त आकाशस्पर्शी भवन, चारही बाजूनी वन, समुद्र होता. लंका त्याला मणीरुपी वस्त्रांनी, गोशाळा व ह्यशाला रुपी कर्णभूषणांनी आणि आयुधांच्या गृहरुपी स्तनांनी, अलंकृत स्त्री प्रमाणे जाणवली. सोन्याने मढलेली हि लंका हनुमानाला गंधर्व नगरीप्रमाणे जाणवली. राक्षसांचे घर, मोती, मानके,सोन्यानी युक्त चमचमते दिसले. कुंभकर्णला दीर्घकाळ झोपण्यासाठी रावणाने सोने, रत्नाचे सर्व सोयींनीयुक्त भव्य असे घर बनविले. रावण संगीताचा जाणकार होता. त्याने एकदा शिवाला आपल्या अंगाना विना बनवून गन्धर्वांप्रमाणे गायन  करून शिवाला प्रसन्न केले. 

रावण दहन - 

 रावणाने सीतेचे अपहरण केले आणि रामाने रावणाचा वध केला. मात्र, हा वध फक्त सीतेसाठी केलेला नसून त्याने देवता, गन्धर्व , ऋषी यासारख्या  महानुभावांना त्रास दिला होता. सगळीकडे त्याच्या अन्यायाने लोक त्रासले होते, त्याने मिळविलेल्या वरदानाचा त्याने मनुष्य अहितासाठी वापर केला होता.  त्यामुळे सृष्टी नियमाला आघात बसला होता असे  या पुराणावरून जाणवते. या सर्व गोष्टींचा विचार करता रामाने रावणाचा  केलेला वध हा अन्यायावरील विजय मानला गेला आणि त्याचा  ज्या दिवशी वध झाला तो दिवस विजयादशमीचा होता आणि त्या दिवशी रावण दहन करतात. या दिवशी दहा तोंडाचा रावण केला जातो मात्र हा कायम आकाराने मोठाच बनविलेला आपण बघतो. यावरून मानवामध्ये हि भावनादेखील असावी कि दुष्ट वृत्ती कितीही भव्य असली तरी तिचा विनाश हा एके दिवशी आपणही करू शकतो.

रावण वेदांचा ज्ञाता होता त्याने शिव तांडव स्तोत्र रचले. शिवाने त्याला तंत्र विद्या सांगितली. रावण हा जरीआपल्याला दुष्ट रूपात पुराणातील कथावरून माहिती असला तरी त्याचे  कथांमध्ये त्याच्या भक्तीचे, त्याच्या शौर्याचे, त्याच्या विवेक बुद्धीचे कथन केलेले जाणून येते.  

त्याच्या पौराणिक लक्षणांना विचारात घेऊनच प्राचीन कलाकारांनी आपल्या कलेमध्ये त्याचे रूप साकारले आहे. त्याच्या विशिष्ट अश्या दशमुखांनी त्याला कलेमध्ये ओळखणे सहज  शक्य होते. त्याच्या पूर्ण प्रसंगामध्ये रावण कैलास पर्वत उचलताना, सितेचे अपहरण करताना आदी काही कथा या कलेव्दारे जास्तच जनसामान्यांपर्यंत पोहचल्यात. त्याच्या कलागुणांचे मात्र भारतीय कलेमध्ये महत्व दाखविलेले दिसत नाही. तो कायम विघातक वृत्तीचा कलेमध्ये आलेला दिसून येतो. शेवटी यावरून भारतीय कलेवर  पारंपरिक वाङमयांचा परिणाम होता हे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

रावण हा एक देवभक्त होता हे हि नाकारता येण्यासारखे नाही कारण, त्याने जर शिव, ब्रम्हा आदींची देवभक्ती केली नसती तर त्याला शक्तिशाली बनविणाऱ्या वरदायी गोष्टी त्याच्याकडे नसत्या आणि त्यातून रावणहि हा एवढा बलाढ्य नसता. रावण एक असा भक्त होता ज्याने स्वतःच्या कठोर तपश्चर्येने देवतांनाही  स्वतःचे ऐच्छिक वर देण्यास भाग पाडले. पण, शेवटी त्याच्या याच ऐच्छिकतेचा उद्रेक त्याच्या विनाशाचे कारण ठरले आणि रावण हा एक अस्वीकारात्मक व्यक्तीविचार  बनला.

 

डॉ. मिनल राजूरकर 

 

https://www.youtube.com/watch?v=CACKIzLaaK8


Featured post

कैलास होते 'रंगमहाल' - Kailas was a 'Rangamahl'

                      कैलास होते 'रंगमहाल' 'कैलास होते रंगमहाल' हे कैलास आणि रंगमहाल या दोन वेगवेगळ्या बाबीचे एकत्रीकरण करण...